Helpline Number: +919420722107 | +917212573255

Email: sevankur@gmail.com

Contact No. 9021591789, 07212573255, +919420722107

Categories
Uncategorized

असाही डॉक्टर…… डॉ अनिल पटेल, यवतमाळ

एक डॉक्टर म्हणून यवतमाळचे कान-नाक घस तज्ञ डॉ अनिल पटेल यांची खुपसे वेगळेपण व वैशिष्ट्ये आहेत.  त्यांचे कन्सल्टिंग दररोज सकाळी ६ वाजता सुरु होते आणि त्याहीवेळी रुग्ण व त्यांचे नातेवाईक वाट बघत  बसलेले असतात. त्यापूर्वी त्यांचे योग-व्यायाम-सायकलिंग हे सर्व झालेले असते. रात्री ९-१० वाजेपर्यंत रुग्णसेवेचे काम मधली आवश्यक नित्यकर्मे सोडलीत तर दिवसभर कुठल्याही विश्रांतीशिवाय सुरु असते. हे सर्व करण्यामागे पैसे मिळवावेत हा त्यांचा उद्देश नसून मला जास्तीत जास्त रुग्णांवर कमीत कमी खर्चामध्ये उपचार करायचा आहे हा असतो.
आतापर्यंत त्यांच्याकडे येऊन गेलेल्या ५ लक्ष रुग्णाचे हाताने लिहिलेले रेकॉर्ड उपलब्ध आहे. कितीही वर्षे आधी रुग्ण आलेला असला तरी नाव-गाव सांगितले कि ते रेकॉर्ड ५ मिनिटातच सापडते व त्यामध्येच नवीन तपशील लिहिला जातो.
त्यांचा सल्ला हा केवळ कान नाक घश्याच्या तक्रारीपुरता मर्यादित नसतो तर, रुग्णाच्या आहार-व्यायाम-व्यसनादि सवयीपर्यंत व प्रसंगी कौटुंबिक प्रश्नांपर्यंत असतो. त्यामुळे त्यांच्या सल्ला व मार्गदर्शनाने अनेकांच्या आयुष्यात चांगले बदल घडून आलेत. अनेक रुग्णांचे तर ते फॅमिली डॉक्टर व सल्लागारच झालेलेआहेत
अनुभवांती त्यांनी औषधे व ऑपरेशन्सचे प्रमाण कमी करत आणले व  बरेचसे आजार हे  साध्या  बिनपैशाच्या उपायांनी बरे होतात म्हणून चुकीच्या सवयी बदलून व्यायाम-आहारादी आरोग्यदायी सवयी, योग्य सल्ला व मार्गदर्शन यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे खूपसे रुग्ण, त्यांच्या सल्ला घेण्यासाठी आवर्जून येतात.
खरेतर त्यांचा यवतमाळशी कसलाही संबंध नव्हता. त्यांचे सर्व बालपण-शिक्षण-पश्चिम महाराष्ट्रात  झालेले.  इकडे ना त्यांचे कोणी नातेवाईक, ना काहीही संपर्क. सोलापूरच्या वैद्यकीय  महाविद्यालयातून  एमबीबीएस झाल्यावर पुढील शिक्षण व अनुभव मुंबई-पुणे येथे घेतल्यावर त्यांनी विदेशात जाऊन भरपूर पैसा व अन्य सर्व भौतिक सुखसोयी मिळण्याच्या सर्व संधी असताना आपल्या  गुरूंच्या “जेथे  गरज आहे तेथे जावे” या सल्ल्यानुसार शोध घेत असता यवतमाळला येऊन पोहचले व १९८० मध्ये स्वतःचा खाजगी दवाखाना सुरु केला. त्यावेळी संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात एकही इएनटीतज्ज्ञ डॉक्टर नसल्याने रूग्णांना वर्धा किंवा नागपूरला जावे लागत असे. त्यासाठी वेळ व पैशांचा अपव्यय होई. त्यामुळे अनेकजण उपचार घेत नसत. गरीब व गरजू रुग्णांवर मोफत उपचार करता यावेत यासाठी त्यांनी सरकारी रूग्णालयात मानसेवी काम मागून घेतले, गेली ३७ वर्षे बरेचदा मोफत वा अतिशय कमी फी घेऊन हजारो रूग्णांना त्यांनी बरे केले.
त्याकाळात त्यांनी परिसरातील खेड्यापाड्यामध्ये रुग्णतपासणीसाठी जायला सुरुवात केलेली, जी आज तागायत ३७ वर्षांनंतरही सुरूच आहे. प्रारंभीच्या काळात एसटीने, नंतर स्कुटरने १५० किलोमीटर पर्यंतच्या परिसरात ते जात असत. पुढे चारचाकी वाहन आल्यावर ते महाराष्ट्राच्या  कानाकोपऱ्यात जायला  लागलेत. आतातर निमंत्रण नुसार त्यांची शिबिरे इतर ९ राज्यांमध्ये पण झालेली आहेत. गेली अनेक वर्षे तर  आठवड्यातील सातहि दिवस त्यांची शिबिरे ठरलेल्या वेळापत्रका नुसार सुरु असतात.  पुढील ३ महिन्याचे  वेळापत्रक त्यांच्या ओपीडीमध्ये लागलेले असते. त्यामध्ये कसल्याही कारणासाठी बदल होत नाही. याबाबतचा  क्रम हा साप्ताहिक, १५ दिवसांनी वा एक महिन्यांनी असा गरजेनुसार त्या-त्या गावात ठरलेला असतो. आतापर्यंत शिबिरासाठीचा त्याचा प्रवासच हा १०-१२ लक्ष किमीपेक्षाही जास्त झालेला असावा.
                 वेळेच्या संदर्भात ते अतिशय काटेकोर आहेत. दवाखाना, घर, सामाजिक जबाबदाऱ्या, छंद या सर्वांचे अतिशय सुंदर नियोजन ते करत आलेले. त्यामुळे मुलगा लहान असताना ते त्याला दहाव्या वर्गापर्यंत ट्युशन न लावता स्वतः शिकविण्यासाठी वेळ काढू शकलेत. कुटुंबियांसोबत वर्षातून एकदोनदा सहल-सुटीचा आनंद,  बाबा आमटे, ठाकूरदासजी बंग या ज्येष्ठांपासून तो डॉ. रवी कोल्हे, वसंत करुणा फुटाणे व इतरही अनेक सामाजिक कार्यकर्त्यांशी वैयक्तिक स्नेह-संबंध, वेगवेगळ्या संस्थांमध्ये जाणे-येणे, त्यांच्या विषयातील होणाऱ्या कॉन्फरन्सेस या सर्वच भूमिकांना ते न्याय देऊ शकलेत. एवढेच नव्हे तर अतिशय नियमितपणे  वाचन, व्यायाम, गाणी ऐकणे इ. अनेक वैयक्तिक बाबींचा पण अतिशय काटेकोरपणे वेळ काढत आलेत. जीवनाच्या  जवळ जवळ सर्वच भूमिका वेळेचे इतके सुंदर नियोजन करून संतुलित अवस्थेत जगण्याचा मनापासून  आस्वाद व  आनंदघेणाऱ्या डॉ. अनिल पटेलांसारख्या व्यक्ती अभावानेच दिसतात.
त्यांच्या आयुष्यावर अनेकांचा प्रभाव राहिलेला आहे. व्यक्ती लहान असो, मोठी असो, जे आवडले-पटले ते त्यांनी आपल्या जगण्यात उतरविण्याचा प्रयत्न केला. महात्मा गांधींचा सिनेमा त्यांनी पाहिला, पुस्तके वाचलीत व त्यांच्या आयुष्यात साधेपणा व इतर मूल्ये दृढ झालीत बाबा आमटे, डॉ रवी कोल्हे व इतर अनेकांकडून असेच काहीतरी ते घेत गेलेत. राजीव दीक्षित, ओशो यांचा पण बराच प्रभाव त्यांच्यावर झालेला. मात्र एवढे असूनसुद्धा कुठल्याच टोकाला न जाता व कोणत्याच चौकटीत स्वतःला बांधून न घेण्याचे पथ्य  मात्र  त्यांनी  सांभाळले.
त्यांनी झोप कमी करण्याचा प्रयोग केला. ती कमीकमी करत त्यांनी आता ४ तासांवर आणलेली आहे. रोज रात्री ते ११ वाजता झोपतात व सकाळी साडेतीनला उठतात. दिवसभर कुठल्याही विश्रांती शिवाय ते कार्यरत असतात.
एक पालक म्हणून हि त्यांच्यापासून बरेच शिकण्यासारखे आहे. एकुलता एक मुलगा गौरवसाठी ते  आवर्जून वेळ काढायचेत, त्यामुळे ते त्याचामित्र बनू शकलेत. त्याला आग्रहपूर्वक मराठी माध्यमाच्या शाळेतच  शिकविले,  फाज़िल लाड केले नाहीत. १८ वर्षपर्यंत त्याला स्कुटर चालवू दिली नाही. सगळीकडे त्याला  सोबत  घेऊन त्याला गरिबी व इतर गोष्टी दाखविल्या. त्यामुळे कदाचित तो आज त्यांचा सामाजिकतेचा वारसा चालवितो आहे.
डॉ. पटेल यांना या वाटचालीत पत्नी सुधाताई आणि मुलाची खंबीर साथ मिळाली. त्यांचा मुलगा डॉ. गौरव हाही इएनटी स्पेशालिस्ट झाला असून तोही वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून सामाजिक बांधिलकी मानत मनापासून गेल्या काही वर्षांपासून रूग्णांची सेवा करत आहे.
आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत हे रुग्णसेवेचे व्रत असेच चालू ठेवण्याचा त्यांच्या मानस आहे.
त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छांसह…. 
संपर्क : डॉ अनिल पटेल, पटेल हॉस्पिटल, सिव्हिल लाईन्स, यवतमाळ  
Email : entonwheels@yahoo.co.in                       Mob. 9130850046
Categories
Uncategorized

माझा ५२ वा वाढदिवस व आयुष्याचे काऊंट डाऊन माझी व प्रयासची वाटचाल :१९८३-२००७

(हा लेख दैनिक हिंदुस्थान, अमरावतीच्या अंकात यापूर्वी प्रकाशित झालेला आहे.)

 १९८३ साली नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामधून एमबीबीएस ही पदवी घेतांनाच, आयुष्यात काय करायचे नाही हा निर्णय माझा झालेला होता. नोकरी करायची नाही, स्वत:चा दवाखाना थाटायचा नाही, आपल्या ज्ञानाचा उपयोग पैसे कमविण्यासाठी न करता समाजातील गरजू लोकांसाठी करायचा. खूप जास्त शिकून काही ठराविक लोकांसाठी काम करण्यापेक्षा सर्वसामान्यांचे जे प्रश्‍न आहेत ते सोडविण्यासाठी काही करता आले तर करायचे, हे नक्की झाल्याने अनेक विषयांमध्ये एमडी/एमएस ला सहज प्रवेश मिळत असतांना पण पुढे शिकायचे नाही हे ठरविले.

 बहुतेकांच्या दृष्टीने हा वेडेपणाचा व अव्यवहारी निर्णय होता. माझ्या अनेक हितचिंतकांनी मला सुनावले की ‘अभी तो ठीक है, जवानी का जोश है, अकेले हो, शादी होगी तब समझेगा. माझे लग्न पण २३ व्या वर्षीच झाले. मग लोक म्हणायला लागले की अभी तो ठीक है, दोनोही अकेले है, बच्चे होंगे तब समझेगा. माझ्या मुलाचा जन्म १९८६ सालचा. मग लोक म्हणायला लागले, की अभी तो बच्चा छोटा है, वह बडा होगा, बढने-लिखने के दिन आऐंगे तब समझेगा. आता तो २६ तर मी ५२ वर्षांचा झालोय. आता लोक म्हणतात की अभी तो ठीक है, तुम्हारे हातपैर चल रहे है, जब हातपैर थकेंगे तब समझेगा. मित्रांनो मला सांगायला आनंद होतोय की, मागल्या ३० वर्षात ही समजण्याची वेळ आली नाही व पुढील ४८ वर्षे तरी येण्याची शक्यता दिसत नाही.
 आमच्यापैकी अनेकांना काहीतरी चांगले करण्याची इच्छा असते. पण मग आम्ही म्हणतो जरा एवढे पूर्ण झाले की करू. आधी शिक्षण, मग कमवायला सुरूवात, लग्न, घरसंसार, मुले, त्यांचे शिक्षण, त्यांना उभे करणे, त्यांची लग्ने, मुले बाळे, निवृत्ती असे करत करत मृत्यू जवळ येवून ठेपतो तरी जगायला सुरूवातच हात नाही. आमच्यापैकी बहुतेक लोक बस्, आता जगणे सुरूच करू या, अशी आयुष्यभर वाटच पहात राहतात. जन्माला येणे, शिक्षण, लग्न-प्रपंच, मुले-बाळे एवढाच आमच्या जगण्याचा उद्देश आहे का ? त्याशिवाय पण आयुष्यात काही करायचे असते की नाही ? त्यासाठी ‘अब नहीं तो कब और मै नहीं तो कौन’ हे प्रश्‍न सतत स्वत:ला विचारत रहाणे गरजेचे आहे.
 ‘का जगायचे’ हे ज्याला कळलेले असते त्याच्यासाठी ‘कसे जगायचे’ हा प्रश्‍न कधीच नसतो. आणि ज्याला का जगायचे हे कळलेले नसते तो आयुष्यभर कसे जगायचे यातच गुरफटलेला असतो. ‘का’ या प्रश्‍नामधून सर्व विज्ञानाचे शोध लागलेत. ‘का’ प्रश्‍नामधूनच सर्व अध्यात्म निर्माण झाले. आजच्या आमच्या बहुतेक प्रश्‍नांच्या मुळाशी आमच्या दैंनदिन जगण्यामधील ‘का’ हा प्रश्‍न लुप्त झालेला आहे हे मुख्य कारण आहे. परमेश्‍वराच्या कृपेने या ‘का’ चे उत्तर शोधणे माझ्या बाबत थोडेसे लवकर सुरू झाल्याने मी इतरांच्या दृष्टीने हा जरा वेडेपणाचा असलेला मार्ग अवलंबू शकलो. गांधी, विवेकानंद, ज्ञानेश्‍वर, तुकाराम, गाडगेबाबा यासारखे पुस्तकांमधून भेटलेले अनेक आयडॉल्स्, बाबा आमटे, यदुनाथजी थत्ते व इतर अनेक मान्यवरांचा मिळालेला सहवास, समविचारी मित्रांचा बनलेला गट यामुळे मला ही आयुष्याची वेगळी वाट चोखाळता येणे शक्य झाले. अशा प्रकारच्या वेगळ्या वाटेने केलेल्या जीवनप्रवासामुळे अतिशय मस्तीमध्ये आनंदी व सार्थक आयुष्य जगता आले. 
 १९८४ साली एक वर्ष गुजरातच्या आदिवासी भागामध्ये राहून काम केले. आपल्या वैयक्तिक गरजा कमी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अमरावती जिल्ह्यातील माधान या १२०० वस्तीच्या गावामधील कस्तुरबा सर्वोदय मंडळ या संस्थेसोबत १९८५ पासून कामाला सुरूवात केली. ९ वर्ष तेथे ग्रामीण व आदिवासी भागामध्ये प्रत्यक्ष राहून आरोग्य, शिक्षण व अन्य क्षेत्रात काम केल्यावर, १९९४ साली प्रयास या संस्थेची चांदूरबाजार या तालुक्याच्या ठिकाणी स्थापना करून आरोग्य व शिक्षण क्षेत्रात काम सुरू केले. मुख्यत्वे ज्यांच्यापयर्ंत कोणत्याही आधुनिक सोयीसुविधा पोहचलेल्या नाहीत, अशा चांदूर बाजार व मेळघाटातील आदिवासी व ग्रामीण लोकांपर्यंत सेवा व प्रबोधनाचे विविध उपक्रम राबविलेत. २ रुपये तपासणी फी, कमीतकमी खर्च व औषधांमध्ये उपचार, फिरता दवाखाना, रोगनिदान शिबिरे, आरोग्य व आहार शिक्षण, आरोग्यजत्रा, कुपोषणासाठी दत्तक योजना, लोकांचा दवाखाना, गरीब व झोपडपट्टीवासीय मुलांसाठी शाळेबाहेरची शाळा, छंद व संस्कार शिबिरे, सहली व भेटी, बालजत्रा, मैत्रीयात्रा, सायकलयात्रा, व्यक्तिमत्व विकास शिबिरे इ. उपक्रम अक्षरश: शेकडो गावे व शाळा-कॉलेजेसमध्ये राबविलेत. १९८५ ते २००७ या २२ वर्षांच्या कालावधीत राबविलेल्या व त्या भागात नविनच असलेल्या या सर्व उपक्रमांना लोकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. हजारो रुग्ण, मुले-युवक-महिलापर्यंत आम्ही पोहचू शकलोत. हे सर्व मुख्यत्वे जनाधारावरच करण्याचा प्रयत्न केला. हजारो लोकांच्या सदिच्छा, प्रेम तसेच प्रत्यक्ष सोबत व मदतीमुळेच हे सर्व शक्य झाले.
 या सुरुवातीच्या २२ वर्षांच्या प्रवासात माधान या १२०० वस्तीच्या एका गावापासून सुरू झालेला हा प्रवास हळूहळू चांदूर बाजार परिसर, मेळघाट व पुढे अमरावती जिल्ह्यातील इतरही भागामध्ये व नंतर महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये विस्तारत गेला. सोबतच अनेक नविन उपक्रमांची भर त्यात पडली. आज राज्यस्तरावर व काही संदर्भात देश पातळीवर आपली व अमरावतीची वेगळी ओळख प्रयासच्या विविध उपक्रमांमुळे झालेली आहे ही आपल्या सर्वांसाठी विशेष आनंदाची बाब आहे. आपणासोबत हा सर्व प्रवास शेअर करावा व १०० वर्षे क्रियाशील जगण्याच्या मी केलेल्या संकल्पानुसार, पुढील ४८ वर्षांसाठी आपल्या अधिक क्रियाशील सहभाग व सहकार्याची अपेक्षा बाळगतो आहे. माझ्या ५२ व्या वाढदिवसानिमित्त प्रयास संस्थेला ७ जुलै २०१३ पर्यंत १००० दानदाते जोडण्याचा संकल्प मी केलेला आहे. १००० किंवा जास्त रुपयांची देणगी प्रयासला देवून आपणही यात सहभागी व्हावे अशी विनंती आहे. या देणगीचा उपयोग अमरावती येथे होत असलेल्या १०००० स्क्वेअर फुटाच्या “प्रयास सेवांकुर भवनाच्या” बांधकामासाठी तसेच प्रयासच्या नियमित खर्चासाठी केला जाणार आहे. आपल्या सहभागाची मी वाट पाहतो आहे. देणगीची रकम आपण प्रयासच्या खालीलपैकी एका बँक अकौंट मध्ये  जमा करू शकता.  
आपला, 
डॉ. अविनाश सावजी                    
1.  PRAYASSaving bank A/No.- 323302010064340
At Union Bank of India, Amravati Branch (IFSC- UBIN0532339)
2.  PRAYAS Chandur BazarSaving bank A/No.-11590669883
at SBI, Chandur Bazar Branch. (IFSC-SBIN0002147)
3.  PRAYAS Chandur BazarSaving bank A/No.-042801001011
at ICICI, Amravati Branch. (IFSC-ICIC0000428)
Donations to PRAYAS are entitled to 50 % tax exemption u/s 80 G of Income tax Act.
PRAYAS is having FCRA registration & can accept foreign donations also.
                                      (FCRA Reg. No. 083730013/ dated 02.09.1998)

पत्ता : प्रयास-सेवांकुर, दंडे प्लॉटस्, राजापेठ, अमरावती  ४४४६०५                                     
Ph. 94207 22107, 82753 29553          Email: sevankur@gmail.com; aksaoji@gmail.com 
प्रयास-सेवांकुर उपक्रमांसाठी: www.prayas-sevankur.org
Categories
Uncategorized

कॅन्सरशी मैत्री करू या !

मागील १० दिवसात मुंबई व नागपूर येथील कॅन्सर झालेल्या दोन व्यक्तींशी प्रत्येकी २० मिनिटे फोनवरच बोलणे झाले. कॅन्सरबद्दल काही बेसिक माहिती, कॅन्सर होण्यामागे व तो बरा होण्यासाठी/नियंत्रणात  ठेवण्यासाठी जीवनशैलीमध्ये कोणते बदल करायला हवेत, आहार व मनाच्या पातळीवर करता येण्यासारखे बदल इ. संदर्भात बोललो, काही पुस्तके वाचायला सुचाविलीत, त्या संवादाने त्यांच्या मनावरचा भर कमी झाला, प्रथमच कोणीतरी असे आश्वासक बोलल्याने खूप बरे वाटले व आजाराशी लढण्याला आणखी बळ मिळाले असे त्यांनी सांगितले. माझा तो दिवस खूप छान व सार्थकी लागला या आनंदात गेला. 
एकूणच यासंदर्भात वैज्ञानिक माहिती व मानसिक आधार यांची असलेली आवश्यकता व त्यामुळे होत असणारे सकारात्मक परिणाम वरील उदाहरणावरून लक्षात येतात. त्यामुळे याप्रकारच्या आजारांमध्ये तुमच्या परिचितांपैकी कोणाला माझी काही मदत होवू शकत असल्यास मला आनंदच होईल. निसंकोच माझ्याशी संपर्क करावा.
Categories
Uncategorized

Audio speech “Mind Power & Human Energy” given by Dr Avinash Saoji

Listen my audio speech “Mind Power & Human Energy” given during training of faculties of Govt. Eng College, Amravati. http://ia601207.us.archive.org/4/items/mindPowerHumanEnergySpeechByDr.AvinashSaojiAtGcoeAmravati/MindPowerHumanEnergySpeechByDr.AvinashSaojiAtGovt.Eng.CollegeAmravatiFacultiesTraining.mp3
Categories
Uncategorized

Reflection on the eve of completing 51 years of my life

Reflection on completing my 51 years of life
I am completing 51 years of my life on tomorrow (7 th May) this year. I have already decided to live for a total of 100 meaningful years. So now I have only 49 years remaining & there are lot many things to do, before I depart from this world. I have started this kind of “countdown” from my last birthday only. It helped me in becoming more focused & choosy regarding utilizing my time for meaningful activities. Now I don’t want to waste time for smaller & meaningless things. I became more affirmative, assertive because of this changed way of looking towards my own life. My communication became more effective & impactful. I am enjoying & experiencing more life, joy, satisfaction & contentedness in my living. I am feeling more energetic with good physical & mental stamina. All this could happen only because of the grace of God & well wishes of friends like you. Keeping my last day of my life in the background of my daily routine, like the antivirus program working in our computers also helped a lot. 

Now I want to invite you to think & reflect back like this & experience the joy & meaningfulness of life like me. GIVING is a very simple way of experiencing it. As a friend & well wisher of you, I want you to start doing something about GIVING in your life. It could be in form of money, time, love & affection, skills and or any other form. You can find out someone/something where your GIVING can make a significant change in someone’s life.

One way of doing it by contributing to various PRAYAS-Sevankur activities. The recurring expenses of Prayas-Sevankur are around 15 Lakhs Rs. this year. In addition to this we need to start & complete our own building “Prayas-Sevankur Bhavan” of 9500 sq. feet at Farshi Stop, Amravati. It will cost around 100 Lakhs Rs. It will be the homely training centre (actually a recharging station) for the children, youths and all others.

I expect from you a monthly or yearly voluntary donation for PRAYAS-Sevankur, as my birthday gift along with your well wishes. It will help me in concentrating on the real content of my work & not on thinking & collecting the funds, to run the activities.

The monthly / yearly contribution could be any amount you think you could give. You can give it by giving standing instructions to your bank to transfer the amount to the bank account of PRAYAS (details given below) every month or year on a specific day of the month or the year. Another way could be you can give it to our collection volunteers. (You yourself can become such a collection volunteer for minimum of 10 contributors.) You also can ask & motivate your other family members & friends to start GIVING this way.

In addition to the monthly / yearly contribution, one time donation for the “Building Fund” is also needed & expected.        

Donations should be made by cash/ account payee Cheque or DD drawn in favor of
 (You can directly deposit it in our following Bank accounts also)
1. “PRAYAS” Union Bank of India, Saving Bank Account no. 323302010064340 (Amravati Branch- IFSC – UBIN0532339)
2. “PRAYAS Chandur Bazar” State Bank of India, Saving Bank Account no.11590669883 (Chandur Bazar branch, Dist. Amravati. IFSC- SBIN0002147)
3.  “PRAYAS Chandur Bazar” ICICI Bank, Saving Bank Account no.042801001011 Amravati branch, Dist. Amravati.
 Donations to PRAYAS are entitled to 50% tax exemption u/s 80G of Income Tax Act.
PRAYAS is having FCRA Registration & can accept foreign donations also. (FCRA Reg. No. 083730013 / dated 02.09.1998)

Categories
Uncategorized

Intro video of “Sevankur Little Champs” program by Dr Avinash Saoji at Jalgaon, which is highly inspirational & appreciated by thousands of spectators at Jalgaon, Nagpur, Wardha, Amravati & Yavatmal. Some selected challenged children share their life story & the struggle they faced for their outstanding achievements.



One of “Sevankur Little Champs” Suyash Khandekar being introduced by Dr Avinash Saoji.



One of the “Sevankur Little Champs” narrating his story of struggle & victory.

Categories
Uncategorized

‘सेवांकुर लिटल चॅम्पस्’ डोळ्यांमध्ये अश्रू उभे करून सर्व समाजाला जगण्याची ताकद देणारा हृदयस्पर्शी उपक्रम

‘सेवांकुर लिटल चॅम्पस्’ डोळ्यांमध्ये अश्रू व मनामध्ये जिद्द निर्माण करून  
अर्थपूर्ण  ज गण्यासाठी ताकद देणारा प्रेरणादायी व हृदयस्पर्शी उपक्रम  

प्रिय मित्रांनो !

सर्व काही व्यवस्थित असून, हातपाय, कानडोळे धडधाकट असूनही, आम्ही आयुष्यात सारखं रडगाणं गात असतो. थोड्या थोड्या अपयशाने खचून जातो, नाही नाही ते नकारात्मक विचार मनात दाटून येतात, स्वत:चेच दु:ख असह्य व भारी वाटायला लागते. एकूणच जगण्यामधील आनंद व उत्साहाचा झरा आटून जातो. अशावेळी गरज असते ती सकारात्मक दृष्टीकोन जोपासून, मार्गात आलेल्या सर्व प्रकारच्या अडचणींवर मात करून काहीतरी मिळवून दाखविणार्‍या जित्याजागत्या आदर्शांची.

असेच काही आयडॉल्स् एकाच मंचावरुन लोकांच्या समोर ठेवणारा प्रयासचा ‘सेवांकुर लिटल चॅम्पस्’ हा नविन उपक्रम. अतिशय आगळ्यावेगळ्या व प्रेरणादायी सिध्द झालेल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुलांना कसं घडवावं, त्यासाठी काय करावं यासाठी चिंतेत असलेल्या पालकांना, आयुष्यात वेगळं काही करू पाहणार्‍या तरुणांना, थोड्या-थोड्या अपयशाने निराश होणार्‍या, खचून जाणार्‍या, भरकटलेल्या, जीवनाचा सूर हरवून बसलेल्या, प्रसंगी आत्महत्येचा विचार मनात येणार्‍या अशा सर्वांना, सकारात्मक दृष्टीकोन व जगण्याची प्रेरणा व एक नवी दिशा व आशा मिळाल्याचा अनुभव नुकत्याच जळगाव, नागपूर व वर्धा येथे झालेल्या ‘सेवांकुर लिटल चॅम्पस्’ या कार्यक्रमातून दिसून आले.

   
‘सेवांकुर लिटल चॅम्पस्’ च्या मंचावरून ज्यांच्या आयुष्यात अनेक अडचणी आहेत, संघर्ष आहेत, अडथळे आहेत, तरीही त्यांनी हार न मानता अथक प्रयत्नांनी काहीतरी मिळवून दाखविलेले आहे अशी काही मुले आयडॉल म्हणून लोकांपुढे आलीत. कोणी अंध, कोणी शरीराने विकलांग, कोणी एचआयव्ही सारख्या दुर्धर आजाराने ग्रस्त,  तर कोणी घरच्या गरीबीशी झुंज देत शिक्षण घेत असणारे. पण या सर्वांमध्ये एक गोष्ट मात्र समान होती व ती म्हणजे जगण्याचा आनंद व उत्साह. समर्थपणे जीवनाशी लढणारी, परिस्थितीविषयी कोणतीही कूरबूर न करता जगायचं कशासाठी व कशारितीने हे ठामपणे सांगणारी भन्नाट ताकदीची ही आगळीवेगळी मुलं. मंचावरून या एकेकाला प्रत्यक्ष पाहून, त्यांची जीवनकहाणी ऐकूनच, त्यांचे अनुभव, जिद्द समजून घेवून अनेकांची आयुष्य बदलतांना दिसलीत.

प्रयास या सेवाभावी संस्थेचे संस्थापक संचालक व सेवांकुर या तरुणांसाठीच्या खुल्या मंचाचे प्रेरक असलेले अमरावतीचे सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते व हजारोंना आपल्या जगण्याचा अर्थ शोधण्यामध्ये मदत-मार्गदर्शन करणारे डॉ. अविनाश सावजी यांच्या सातत्यपूर्ण कामामधून व चिंतनातून हा अतिशय प्रेरणादायी व उपस्थितांची हृदये हेलावून सोडणारा उपक्रम साकार झालाय. ‘सेवांकुर लिटल चॅम्पस्’ कार्यक्रमात ते स्वत: मंचावर या मुलांशी संवाद साधून त्यांना बोलतं करतात, त्यांच्या कणखर जगण्याची कहाणी सर्वांसमोर उलगडून दाखवितात. यासोबतच ते त्यांच्या स्वत:च्या वेगळ्या वाटेने केलेच्या जीवनप्रवासातून, त्यांना स्वत:च्या स्वधर्माचा शोध कसा लागला, गेल्या २८ वर्षांच्या प्रदिर्घ अभ्यास व सामाजिक कार्याच्या अनुभवांद्वारे अर्थपूर्ण जीवन का व कशासाठी जगायचे, यश कसे मिळवावे, सकारात्मक दृष्टीकोन, व्यक्तिमत्त्व विकास इ. अनेक विषयांवर विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्याशी संवाद साधतात. त्यांची करुणा व तळमळ, त्यांच्या शब्दाशब्दांमधून पाझरते व सर्व उपस्थितांच्या हृदयांना चिंब भिजवून, डोळ्यांमधील अश्रूंद्वारा ती मुक्तपणाने वहायला लागते. या संपूर्ण कार्यक्रमामध्ये ते सर्व प्रेक्षक/श्रोत्यांना एका वेगळ्याच उंचीवर त्यांच्यासोबतच घेवून विहरतात.  

‘सेवांकुर लिटल चॅम्पस्’ या उपक्रमाची काही वैशिष्ट्ये 

१. २२ जानेवारी २०१२ ला पहिला कार्यक्रम जळगाव येथे झाला व त्यानंतर १२ व १९ फेब्रुवारीला  तो नागपूर व वर्धा येथे झाला. अशाप्रकारे एका महिन्याच्या कालावधीतच तीन वेगवेगळ्या शहरात कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

२. जळगाव व नागपूर येथे ३५००-४०००, तर वर्धा येथे २५०० प्रेक्षक-श्रोत्यांची उपस्थिती या कार्यक्रमांना लाभली होती. आणि हे सर्व आयोजन करणार्‍या प्रयास संस्थेमध्ये पूर्ण वेळ कार्यकर्त्यांची संख्या फक्त चार असतांना. याचाच अर्थ प्रयास-सेवांकुरचे या सर्व ठिकाणी स्वयंसेवक/पाठीराखे यांचे नेटवर्क व त्यांची बांधिलकी किती प्रचंड असणार हे लक्षात येते.

३. कोणी क्रिकेटवीर नाही, कोणी सिनेनट नाही, कोणी राजकारणी नाही, त्या अर्थाने कोणीही सेलिब्रीटी  नाही, मंचावर येणारा एकही चेहरा ओळखीचा नाही, नृत्य-गायन वा अन्य कसल्याही प्रकारचा मनोरंजनाचा कार्यक्रम नाही, तरी एवढ्या मोठ्या संख्येने तीनही शहरांमध्ये कार्यक्रमासाठी लोक आलेत हे एक आश्‍चर्यच मानायला पाहिजे. या कार्यक्रमांचे नियोजन/आयोजन केवळ ५ ते १० दिवसांच्या कालावधीत करण्यात आले होते हे आणखी एक आश्‍चर्य.

४. आज सिनेमा थिएटरमध्येही लोक एका जागेवर दोन तासांसाठीही बसत नाही, या पार्श्‍वभूमीवर या कार्यक्रमासाठी आलेले लोक मात्र साडेतीन-चार तास झालेत तरी जावू इच्छित नाहीत, ही या उपक्रमाची ताकद दिसून आली. केवळ एक चक्कर मारुन निघून जावू वा १० मिनिटे बसू व निघून जावू हे ठरवून आलेले बहुतेक लोक संपूर्ण कार्यक्रम झाल्याशिवाय तर स्वत: जात नाहीतच, उलट फोन करुन घरी राहिलेल्यांना व इतर मित्रांना आग्रहपूर्वक कार्यक्रम बघण्यासाठी तातडीने बोलावून घेतात हे कशाचे द्योतक आहे ?
५. प्रत्येक कार्यक्रमाचा एक विशिष्ट श्रोता/प्रेक्षक वर्ग असतो. मुलांच्या कार्यक्रमामध्ये मोठे फार रमत नाहीत, तर मोठ्यांच्या कार्यक्रमात मुले कंटाळतात. ‘सेवांकुर लिटल चॅम्पस्’ हा एक असा कार्यक्रम ठरला की घरातील तीनही पिढ्यांना जो सारखाच भावतो व त्यामुळे मुले, त्यांचे पालक व आजी-आजोबा अशा तीनही पिढ्यांना त्यामधून स्वत:साठी काहीतरी मिळते.
६. तीनही ठिकाणी अशा प्रकारची अनेक स्थानिक लढणारी कणखर मुले शोधता आलीत व त्यांना पण मंचावर सर्वांच्या पुढे सादर करता आले. त्यामुळे अशी मुले काही फक्त मंचावर आलीत तीच आहेत असे नव्हे, तर आपल्याही शहरात, गावात, गल्लीत, शेजारी पण असे आदर्श असू शकतात व त्यांचा शोध घेण्याची दृष्टी या कार्यक्रमाद्वारे सर्व उपस्थितांना लाभते हे लक्षात आले.
७. मंचावर कोण मुले लोकांपुढे आलीत हे पण फारसे महत्वाचे नसल्याचे अनुभवास आले. जगण्यात संघर्ष, त्यावर मात करुन काहीतरी मिळविले आहे व हे सर्व जीवनमूल्यांना जपून, ही त्रिसूत्री ज्यांच्या आयुष्यात आहे अशी कोणीही ‘सेवांकुर लिटल चॅम्पस्’ म्हणून लोकांना तेवढीच भावतात असे दिसून आले.
८. मंचावर सादर होणार्‍या मुलांसाठी तर हा कार्यक्रम त्यांच्या असलेल्या आजारासाठी, त्यांच्या विकलांगतेसाठी, समस्येसाठी एक थेरेपी ठरतो. उदा. पाणेरी या मुलीच्या बोलणे, हस्ताक्षर, स्नायूंची शक्ती व हालचालींमध्ये सुधारणा झाल्याचे दिसून आले. राणी या मुलीला अद्याप एचआयव्हीसाठी एआरटी औषधोपचार सुरु करण्याची गरज भासलेली नाही.
९. मंचावरील मुलांप्रमाणेच समोर बसलेल्या शरीराने धडधाकट असणार्‍या व सर्व काही व्यवस्थित असूनही मनाने अपंग असणार्‍या सर्वांसाठी पण ही एक थेरेपी ठरते असे दिसून आले. अनेकांनी आमची निराशा दूर झाली, तणाव कमी झालाय, आमची समस्या ही आता फारच किरकोळ वाटायला लागली असे सांगितलेय. एकूणच समाजाच्या सर्वच थरात पसरलेल्या सामूहिक निराशा व नकारात्मक विचारांसाठी ‘सेवांकुर लिटल चॅम्पस्’ हा कार्यक्रम एक मास थेरेपी म्हणून उपयोगी पडत असल्याचे दिसून येते.
१०. मंचावरुन लोकांपुढे आलेल्या मुलांना मदत करण्यासाठी प्रेक्षक/श्रोत्यांमधून कोणीतरी लगेच स्वत:हून समोर येतांना सगळीकडेच दिसून आले. उदा. सुयश या मुलाच्या पुढच्या सर्व शिक्षणाची आर्थिक जबाबदारी उपस्थितांपैकी बीडच्या एका प्रेक्षकांनी उचलली. जळगावच्या तेजस या अतिशय गोड गळा असणार्‍या अंध मुलाला संगीत शिकविण्यासाठी जळगावचेच एक संगीत शिक्षक समोर आलेत. याप्रकारे काहीतरी चांगले करण्याची इच्छा असणार्‍यांना पण या कार्यक्रमातून एक रस्ता मिळतोय असे दिसते.
११. तीनही ठिकाणच्या कार्यक्रमांची जी दखल ज्याप्रकारे सर्वच वृत्तपत्रांनी घेतली तो पण एक सुखद आश्‍चर्याचा धक्का होता. सगळीकडेच कार्यक्रमाच्या बातम्या बहुतेक सर्व वर्तमानपत्रांमध्ये, जवळपास संपूर्ण पाव ते अर्धा पेज छापून आल्यात. बातम्यांचे मथळेच अतिशय वेधक होते. ‘सेवांकूर लिटील चॅम्प्सनी जळगावकरांना जिंकले, सकारात्मक विचारांचे धडे दिलेत, जगण्यची एक नवी दिशा दिली, सेवांकुर लिटील चॅम्प्स् देवदूताच्या स्वरुपात नागपूरात अवतरलेत, त्यांनी सर्वांना रडविले, वर्धेकर गहिवरलेत असे होते. या बातम्या वाचूनच अंगावर शहारे येतात व डोळ्यांमध्ये अश्रू अशी प्रतिक्रिया कार्यक्रमाला उपस्थित नसणार्‍या अनेकांनी दिल्यात.
१२. अगदी व्यावसायिक प्रकारच्या कुठल्याही कार्यक्रमाला सुध्दा या पातळीचा प्रतिसाद, गर्दी, प्रसिध्दी व परिणामकारकता पहिल्याच प्रयोगापासून मिळाल्याचे ऐकिवात नाही. सर्वच दृष्टीने नितातं सुंदर व हृदयस्पर्शी ठरलेल्या या उपक्रमाला सर्व महाराष्ट्रात व देशातसुध्दा घेवून जाण्याचा संकल्प ‘सेवांकुर लिटल चॅम्पस्’ चे जनक डॉ. अविनाश सावजी यांनी केलेला आहे.
१३. या कार्यक्रमाला अल्पावधीतच हे जे यश व उंची प्राप्त झालेली आहे, त्यामागे मंचावर येणारे लिटील चॅम्प्स् तर आहेतच. पण त्याचबरोबर डॉ. अविनाश सावजी यांचे अतिशय अर्थपूर्ण व हृदयाला हात घालणारे निवेदन, त्यांची तळमळ, त्यांची गेल्या २८ वर्षांची निस्वार्थ व निरपेक्ष समाजसेवेची साधना, वागण्या-बोलण्यातील सहजता, जगण्यातील साधेपणा, शब्दाशब्दांमधून प्रगट होणारे निगर्वी व अनाग्राही परंतु ठाम व्यक्तिमत्व, सर्वच वयोगटातील व विविध सामाजिक स्तरातील लोकांसोबत त्यांच्याच भाषेत सुसंवाद साधण्याचे कौशल्य या पण बाबी तेवढ्याच महत्वाच्या आहेत. त्यांच्या उस्फुर्त व अतिशय अनौपचारिक निवेदनातून प्रत्येकालाच काहीतरी नविन जीवनोपयोगी सूत्रे मिळतात. दरवेळी त्यामध्ये नाविण्य सुध्दा असते.
१४. ‘सेवांकुर लिटल चॅम्पस्’ हे डॉ. अविनाश सावजी यांच्या प्रयास-सेवांकुरच्या प्रयोगशाळेत शोधल्या गेलेले एक अगदी कोरे करकरीत साधन. अनेकांची आयुष्य बदलविण्याचे सामर्थ्य असलेले, एक प्रचंड ताकदीचे हत्यार पेलण्यासाठी, तेवढेच सामर्थ्यशाली असलेले डॉ. अविनाश सावजी यांचे व्यक्तिमत्व व सेवांकुर लिटील चॅम्प्स् च्या स्वरुपात समोर आलेली दुर्दम्य इच्छाशक्ती व  प्रचंड ताकदीची मुले. लाखो लोकांपर्यंत हा उपक्रम पोहचविण्यासाठी आपण संपर्क करु शकता.
१५. एप्रिल महिन्यात हाच कार्यक्रम अमरावती, यवतमाळ व वर्धा येथे दि. २१, २२ व २३ तारखांना होत आहे. आपल्या शहरात असा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी प्रयास अमरावती येथे संपर्क करा.
Categories
Little Champs motivation Positive Attitude Sevankur Wardha

लिटल चॅम्प्सनी दिली जगण्याची नवी उमेद!

2500 audience, 3.5 hours long, highly inspiring-heart touching, “Sevankur Little Champs” at Wardha on 19 Feb. 
Read in Loksatta 

लिटल चॅम्प्सनी दिली जगण्याची नवी उमेद!

Categories
Uncategorized

यशाची मूलभूत साधने

यशाची मूलभूत साधने
आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये ताठ मानेने जगण्यासाठी व समर्थपणे सर्व आव्हाने पेलण्यासाठी, आम्हाला आमची कौशल्ये, क्षमता व गुणांचे संवर्धन करावे लागणार. त्यासाठी वैज्ञानिक दृष्टीने स्वत:चे निरीक्षण करणे, गरजेनुसार स्वत:च्या दैनंदिन जीवनामध्ये वेगवेगळ्या पातळ्यांवर, विविध प्रयोग करुन, आवश्यक ते परिवर्तन करणे ही आवश्यक असेल. स्वत:मध्ये असणार्‍या कौशल्ये, क्षमता व गुणांचा शोध घेणे व त्यामध्ये सतत भर घालण्यासाठी प्रयत्न करत राहणे महत्वाचे असेल. हे सर्व शिकण्यासाठी व प्रत्यक्ष कृतिमध्ये आणण्यासाठी, अशा काही चाकोरी सोडून जगणार्‍या यशस्वी व्यक्तिमत्वांचा सहवास व त्यांच्या अनुभवांचे शेअरींग खूपच उपयोगी व मार्गदर्शक ठरु शकेल. काहीतरी वेगळे करू इच्छिणार्‍यांसाठी तर हे नक्कीच दिशादिग्दर्शक ठरु शकेल.
विज्ञान हे आमच्या दैनंदिन जगण्यामध्ये येणे, आमच्या प्रत्येक विचार व आचारामध्ये येणे म्हणजे खर्‍या अर्थाने वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासणे होय. याप्रकारे विज्ञाननिष्ठ होता आलं तर आमचे जीवन हे बदलणारच. त्यासाठी स्वत:च्या आयुष्यात प्रयोग करत राहणे मात्र गरजेचे आहे. आम्ही अशाप्रकारे स्वत:ला कधी तपासलेले नसते. त्यामुळे स्वत:ला स्वत:ची ओळखसुध्दा फारच अपुरी असते. त्यामुळे स्वत:ला खर्‍या अर्थाने ओळखणे, स्वत:चा शोध घेणे, अशा प्रकारे सुरुवात करता येऊ शकते.
त्यादृष्टीने आम्हाला आमच्या जीवनामध्ये दोन प्रकारे शोध घ्यायला पाहिजे. या जगामध्ये राहणार्‍या सातशे कोटी लोकांपैकी कोणत्याही दोन व्यक्तींच्या अंगठ्याचे ठसेसुध्दा सारखे नसतात. मग जर आमचा प्रत्येकाचा अंगठ्याचा ठसासुध्दा सारखा नाही, याचाच अर्थ माझ्यामध्ये नक्कीच असे काहीतरी वेगळे आहे, जे या संपूर्ण जगामध्ये फक्त माझ्यामध्येच आहे व इतर कोणाहीमध्ये ते नाही, याचा शोध लागला तर कायम स्पर्धा करण्याची गरज राहणार नाही. दुसर्‍या बाजूने आमच्यामध्ये एवढ्या सगळ्या विविधता असतानांसुध्दा आमच्यामध्ये काहीतरी समान आहे. या समानतत्वाचा शोध लागल्यास प्रत्येकाशी माझे नाते जडेल. अशाप्रकारे या दोन अंगांनी स्वत:चा शोध घेणे माणसाच्या जगण्याला अर्थ प्राप्त करून देतो. असा शोध घेणे हाच माणसाचा जगण्याचा हेतू असावा. असा शोध घेणे इतर प्राणीमात्रांना शक्य नाही. माणूस मात्र असा शोध निश्‍चित घेवू शकतो. असा शोध जर घ्यायला सुरुवात केली तर आमच्या आयुष्याची लांबी आणि खोलीसुध्दा आपोआपच वाढेल. आनंद व खर्‍या अर्थाने मस्तीमध्ये प्रत्येक क्षण जगते येईल.
मला काहीतरी नविन शिकायचे आहे वा माझ्यकडे असलेले काहीतरी मला द्यायचे आहे, ही वृत्ती आम्हाला जगण्याचा अर्थ शोधण्यामध्ये मदत करते. सामान्य व असामान्य किंवा यशस्वी व अयशस्वी व्यक्तीमध्ये फारसा फरक नसतो. जसा एखादा मूर्तिकार छन्नी-हातोडा घेवून मूर्ती कोरतांना दगडावर घाव घालत असतो. १०-२०-५० घाव लागोपाठ मारूनही जेंव्हा दगड फुटत नाही तेंव्हा त्याला जर वाटले की ५० वेळा घाव घालूनही दगड फुटला नाही याचाच अर्थ पुढचे ५० घावही दगड फुटणार नाही आणि त्याने प्रयत्न करणे सोडून दिले तर तो अयशस्वी ठरतो. यशस्वी व्यक्ती प्रयत्न सोडत नाही व बरेचदा तो दगड ५१ व्या घावातच फुटतो. म्हणजेच यशस्वी आणि अयशस्वी व्यक्तीमध्ये ५० घावांचे अंतर नसते, तर बरेचदा केवळ एकाच घावाचे अंतर असते. आपल्यापैकी अनेक लोक यशप्राप्तीसाठी प्रयत्न करून ही अयशस्वी झालो असू तर यशापासून आपण काही पावलेच दूर होतो हे विसरू नका व प्रयत्न सोडू नका. यश नक्कीच तुमच्या गळ्यात माळ टाकल्याशिवाय राहणार नाही.
शरीर, बुद्धी, मन व वेळ आणि पैसा ही यशप्राप्तीची मूलभूत साधने आपण कशी वापरतो यावर आपलं भविष्य अवलंबून असते. एखाद्या कारागिराला जशी आपली हत्यारे नेहमी धारदार ठेवावी लागतात व काळजीपूर्वक वापरावी लागतात, तशीच आपणही ही पाच हत्यारे कायम धारदार कशी राहतील व त्यांचा योग्य तो वापर कसा करायचा याचा विचार करावा लागेल व यावरच आपलं भविष्य व भवितव्य अवलंबून असेल.

माणसाचं आयुष्य तो किती वर्ष जगला यावर नाही तर, किती अविस्मरणीय क्षण जगला यावरून मोजायचे असते. आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तींकडून तर आपण शिकतच असतो. खरी कसोटी तर आपल्यापेक्षा लहान व्यक्तींकडून शिकण्यात असते. आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींकडे त्या नजरेने पहायला शिकणे ही खरी दृष्टी असेल. यालाच गुणग्राहकता असेही म्हणतात. ही सर्वांकडून शिकण्याची वृत्ती कायम राखणे आम्हाला समृध्द बनवित असते. ‘‘ज्या लोकांना कशासाठी जगायच हे माहिती असते, ते कोणत्याही परिस्थितीत आनंदाने जगू शकतात. ज्यांना हे माहिती नसते ते लोक आयुष्यभर कसं जगायचं याच चक्रात अडकलेले असतात.’’ मी कशासाठी जगतो आहे, माझ्या जगण्याचा हेतू काय आहे, हे जर मला नाही कळले तर आयुष्य नुसतेच खाण्यापिण्यात व निरर्थक गोष्टी करण्यात वाया जाईल. आयुष्य हे एकदाच मिळते व ते अमूल्य आहे. मग ते केवळ पैशांसाठी एक्सेंज करणे हा मूर्खपणा असेल. त्याहून मोठे काहीतरी आयुष्यात करायचे आहे, ते काय असेल ते तुमच्यासाठी तुम्हालाच ठरवायचं आहे.
(यशस्वी व्हा या मी लिहिलेल्या पुस्तकामधून घेतलेला लेख) 

Categories
Uncategorized

माझा शैक्षणिक प्रवास

माझा शैक्षणिक प्रवास
बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा या जन्मगावीच माझे दहावी-बारावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले. घरी निम्न मध्यमवर्गीय व्यापारी कुटूंबाची पार्श्‍वभूमी. घरामध्ये कुणी फार जास्त शिकलेले नव्हते. १०+२ या अभ्यासक्रमाची माझी पहिली बॅच. १९७५ साली दहावी, तर १९७७ साली बारावी झालो. अभ्यासामध्ये सुरवातीपासून चांगला होतो. चौथी व सातवीला स्कॉलरशिप परिक्षा गुणवत्ता यादीमध्ये पास झालो. दहावीला नागपूर बोर्डातून गुणवत्ता यादीत १६ वा क्रमांक व संपूर्ण बोर्डातून मराठीमध्ये प्रथम, गणितामध्ये द्वितीय, तर विज्ञानामध्ये तिसरा क्रमांक आलेला. बारावीच्या परिक्षेत सुध्दा गुणवत्ता यादीमध्ये पास झालो. पुढे नागपूर शासकीय महाविद्यालयामधून एमबीबीएस ही पदवीसुध्दा प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झालो.
मागे वळून पाहिले असता हे जे काही शैक्षणिक यश मी मिळवू शकलो, त्याची कारणे काय असावीत याचा विचार करतो तेंव्हा काय वाटते ते तुमच्याशी शेअर करतोय. माझे गाव सिंदखेडराजा हे तसे आडवळणाचे, जेमतेम ८००० लोकवस्तीचे. आता तालुक्याचे केंद्र झालेय. तेंव्हा तालुका सुध्दा नव्हता१९७५ साली म्हणजे आज पासून ३७ वर्षांपूर्वी इतर कुठल्याही आधुनिक सोयी-सुविधांचा अभाव, फारशा मार्गदर्शनाची शक्यता तर नव्हतीच. मग असे असतांना १०-१२ वी ला आणि पुढे सुध्दा जे यश मी मिळवू शकलो याची कारणे शोधली असता एक लक्षात येते, ते म्हणजे लहानपणापासून वाचनाची असलेली आवड. त्याकाळात सिंदखेडराजासारख्या छोट्याशा आडवळणाच्या गावात वाचायला तरी काय मिळणार ? पण घरी किराणा दुकाण असल्याने सामान बांधून देण्यासाठी वर्तमानपत्राची रद्दी भरपूर असायची; त्यातून शनिवार-रविवारच्या पुरवण्या काढून वाचायचो. पुढे सातवी-आठवीमध्ये असतांना रहस्यमय कांदबर्‍या वाचायला लागलो. त्याकाळात बाबुराव अर्नाळकरांच्या झुंजार, काळापहाड इ. रहस्यकथा लोकप्रिय होत्या. १००-१५० पानांचे पुस्तक साधारणत: तासाभरात वाचून होत असे. नववीमध्ये असतांना हिंदी वाचनाची सुरूवात झाली. गुलशन नंदा, रानू इ. लेखकांचे उपन्यास त्याकाळी चलनात होते. दहाव्या वर्गात असतांना अशी निदान १०० तरी पुस्तके मी वाचली असतील. घरचे रागावतील म्हणून अभ्यासाच्या वही-पुस्तकामध्ये लपवून वाचायचो. २००-२५० पानांचे पुस्तक दोनेक तासात वाचून संपवायचो. ही जी वाचनाची आवड होती, त्यामुळेच वाचनाचा वेग वाढला, शब्दभांडार समृद्ध झाले व अभिव्यक्ती पण सुधारली असावी. त्यामुळेच कदाचित मराठी विषयामध्ये बोर्डात प्रथम क्रमांक मिळवू शकलो. हे केवळ मराठी विषयाच्या अभ्यासाने नक्कीच शक्य झाले नसते.
दहावीला गणितामध्ये १४९ मार्क मिळवून बोर्डात दुसरा क्रमांक होता. हे पण केवळ गणिताच्या पुस्तकाच्या अभ्यासाने घडले नाही. तर घरी दुकान होते. समोर दुकान व मागे घर असल्याने अगदी लहानपणापासून दुकानात बसावे लागायचे. ग्राहकांशी व्यवहार करतांना हिशोब करावा लागायचा. तोही बहुतेक वेळा तोंडी, कॅल्क्युलेटर वगैरे तर त्याकाळी पोहचलेलेच नव्हते. माझ्या वडीलांचा हिशोब तर अगदी तोंडपाठ असायचा. कितीही अंकी बेरजा ते अगदी झटक्यात व बिनचूक करायचेत. त्यांच्या प्रभावाने हिशोब जलदगतीने व न चुकता करायला शिकलो. आठवीत असतांना शाळेमध्ये संचयनी ही विद्यार्थ्यांची बचत बँक हि योजना नव्यानेच सुरू झाली होती, तिचा मॅनेजर म्हणून काम केले. या सर्वांचा फायदा गणित विषयाच्या अभ्यासासाठी सहजच झाला. म्हणूनच कदाचित गणित हा विषय माझा नेहमीसाठीच अतिशय आवडता राहिला. गणित विषयाच्या आवड व अभ्यासाने एकूणच माझ्यामध्ये असलेली हिशोबी वृत्ती विकसित झाली असावी व त्यामुळेच आयुष्यातील बर्‍याच गोष्टी काटेकोर व हिशोबाने करण्याची सवय लागली.
विज्ञान या विषयामध्ये १४७ मार्क घेवून बोर्डात ३ रा क्रमांक होता. त्याचेही कारण केवळ विज्ञानाच्या पुस्तकांचा अभ्यास नाही; तर निरीक्षण व प्रयोग करून पाहण्याचा छंद. आठवीपासून माझ्या घरी माझी स्वत:ची भंगार सामानामधून उभारलेली छोटीशी प्रयोगशाळा होती. या प्रयोगशाळेत भौतिक, रसायन व जीवशास्त्राचे बहुतेक सर्व प्रयोग मी स्वत: केल्याचे आज ४० वर्षांनतरही मला स्पष्ट आठवते. त्यामुळे विज्ञानाचा अभ्यास हा खेळाचा व आनंदाचा भाग झाला व त्याचे रुपांतर मार्कांमध्येही झाले. त्याशिवाय यातून वैज्ञानिक दृष्टी विकसित झाली, निरीक्षण व प्रयोगशीलता ही विज्ञानाचा अभ्यास करण्याची मूलभूत साधने हाताळण्याचे कसब प्राप्त झाले; प्रत्यक्ष जीवनाच्याही प्रयोगशाळेत त्यामुळे नानाविध प्रयोग करता आलेत व जगणे सुध्दा आनंद व खेळ झाले. कोणत्याही प्रश्‍नाचा शास्त्रीय दृष्टीने विचार करून उत्तरे शोधण्याची सवय लागली. समस्येला समस्या न मानता चॅलेंज म्हणून बघायला शिकलो. अशा आव्हानांना सामोरे जातांना स्वत:च्या क्षमतांचा शोध घेवून त्या विकसित करता आल्यात.
याच सवयी व वृत्ती पुढे १२ वी व मेडीकल कॉलेजमध्येही कायम राहिल्याने नेहमीच अभ्यास एन्जॉय करू शकलो. बहुतेक अभ्यासाची पुस्तके पण कथा-कादंबर्‍या वाचल्यासारखा आनंद देवून जायचीत. त्यामुळे अभ्यासाचे ओझे कधी वाटले नाही व फक्त परिक्षेमध्ये मार्क मिळविण्याच्या हेतूने पण कधी अभ्यास केला नाही.
आता कोणतीही परिक्षा द्यायची नसली तरी अभ्यासाची हीच सवय कायम आहे. आजही वर्षाला विविध विषयांचे, इंग्रजी, मराठी व हिंदी या तीनही भाषांमधील साधारणपणे ४०००० पेजेस वाचतो. त्यामुळे आनंद तर मिळतोच; शिवाय जगाच्या बरोबर राहता येते. 
यावेळी एवढेच. याच प्रवासातील काही अनुभव पुढच्या वेळी …….
(१ नोव्हेंबर पासून दर आठवड्याला काही तरी लिहायचे ठरवले होते. पण अजून सवय पक्की व्हायची आहे. आतापर्यंत तीन लेख लिहून झालेत. शतायुषी होण्यासाठी ! सदा तरुण राहण्यासाठी !, आपले वजन:आपल्या जीवनशैलीचे निदर्शक, व उपाशी न राहता वजन कमी करा, काही वैज्ञानिक तथ्ये व व्यावहारिक क्लुप्त्या  मागील ४० दिवसात जवळपास २७०० भेटी ब्लॉगला झाल्यात. आपण सर्वांचा जो उदंड प्रतिसाद मिळातोय, तो मला आळस झटकून लिहिणे सुरु ठेवायला भाग पाडत आहे.
आता मी माझ्या आयुष्यातील काही अनुभव, काही लर्निन्ग्स तुमच्यासोबत शेअर करण्याचे ठरवीत आहे. माझा शैक्षणिक प्रवास या आताच्या लेखात मला मिळालेल्या शैक्षणिक यशाकडे मागे वळून पाहताना काय वाटते ते लिहिले आहे. कदाचित यापैकी काही तुम्हाला पण उपयोगी पडू शकतील. प्रतिसादाच्या प्रतीक्षेत.)

Add address